Tuesday, June 12, 2012

पुराना मोड

पुराना मोड

सकाळी मुंबईहुन पुण्याला जाताना काही सुचले...आणि लिहीले...
जसे जसे सुचत गेले तसे  लिहित गेलो... विचार सैरवैर पळत होते... म्हणून स्वच्छंदी लिहीत गेलो..
आणि एकदा लिहून झाले की परत बघितले नाही... म्हणून कदाचित तेवढी चांगली झाली नसेल..
तेवढे समजून घ्या.. :) :) :) 
_______________________________________________________________________________


Monday, December 19, 2011

पहिली भेट - भाग ३







ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातल्या पात्रांचा घटनांचा कोण्याही व्यक्तीशी किंवा माझ्याशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास योगायोग समजावा.

कथेचा पहिला भाग  आणि दुसरा भाग येथे दिला आहे.... 
____________________________________________________






आता हा काय प्रश् झाला??? एवढ्या प्रेमाने कॉल केला ... त्यात हिला कसली चिंता की मी काही विसरलो का?? वाटले उत्तर द्यावे की विसरलो नाही पण मिस करतोय... नंतर सकाळचे उद्योग आठवले आणि प्प झालो...

"सहज केला होता... चल तुझ्याशी नंतर बोलतो." आणि फोन ठेवला.
अजूनही मी माझ्या सकाळच्या धुंदीतुन बाहेर आलो नव्हतोअर्णवला पिंग केले आणि बोललो की चल चहाला जाऊआम्ही दोघे कॅंटीन मध्ये आलो
आता तिचा कॉल आला....

"अहो, तुम्ही ठीक आहात ना??"
"हो ग.. मी तर ठीक आहे... असे का विचारतेस???"

"नाही... सकाळीपण तुमचे वागणे थोडे वेगळे होते.. आताही कॉल केला आणि काहीच बोलले नाहीत. म्हणून विचारले..."

तिचेही बरोबर होते. मी असा वेंधळ्यासारखा वागायला लागलो तर कोणालाही शंका येणारच ना... आणि ती तर बायको होती. माझे दररोजचे वागणे बघत होती. अचानक बदल दिसल्यावर कोणीही असे विचारणारच...

"अग.. तसे काही नाही आहे.. तू काही त्रास करून घेऊ नकोस..."

"ठीक आहे... संध्याकाळी घरी केव्हा येणार???"

हा एक त्रास तर प्रत्येक लग्न झालेल्या माणसाला होतो. संध्याकाळी केव्हा येणार... प्रश्नपण तेच विचारतात आणि प्रश्नातच उत्तर ही टाकतात.

"येतो... काम संपले की... ६ च्या आसपास..."

असे बोलून मी फोन ठेवला... अर्णवला म्हटलो की आज सर्व काम ६च्या आत उरकयला हवे... नाहीतर परत संध्याकाळी फोन येईल. बेचैनीतच चहा संपवला आणि आम्ही वर निघालो. प्रभाच्या डेस्कवर गेल्या गेल्या तोंड उघडले आणि बोललो की संध्याकाळी आपल्याला राउतला जायचे आहे. तेव्हा अर्णवने असे बघितले जणू काही मी तिला डेटवर घेऊन जातोय आणि का नाही बघणार... कारण राउत एक हॉटेलचे नाव आहे आणि त्याच्यासमोरच मी त्याच्या वहिनीला घरी येण्याची वेळ सांगितली होती. आज माझ्याकडून बर्‍याच गोष्टी घडत होत्या...

दुपारी ४ला मी क्यूबिकलच्या बाहेर डोकवून बघितले तर नेहमीप्रमाणे अर्णव प्रभाच्या डेस्कवर टाइमपास करत होता. परत डोके खाली घातले. आता प्रभाला निघायला सांगायचे होते पण सांगू कसे?? तो अर्णव तर तिला सोडायला तयारच नव्हता.

मोबाइल उचलला आणि प्रभाला निघायचा मेसेज पाठवला. निरोप तर पोहोचला होता, पण तो अर्णवला ही समजला. तो माझ्यजवळ आला आणि विचारले...

"तू मला सांगणार आहेस ... हे काय चालू आहे ते???"

"चहा पीणार??"

"तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे आधी..."

"अरे असे तडकाफडकी नको...थोडे शांतीला पकड... चल चहा पीऊ..."

आता मात्र गोची झाली होती. याला काहीतरी पट्टी पढवावी लागणार होती... जास्त कठीण पण नव्हते.. तरी ही....थोडा वेळ त्याला समजवले... तो मानला... तरीही अजुन एकदा म्हटलो...

"प्लीस मैत्री निभव...."

"पक्की निभवेन...."

हे वाक्य दुहेरी होते. कोणता अर्थ घ्यावा ते समजले नाही.... पण मला ही विचार करायला वेळ नव्हता. मी प्रभा ला घेऊन निघालो... तिने विचारले कुठे जायचे आहे??

"अग... आज हिच्यासाठी काहीतरी घेऊ म्हणतोय... आता तुझ्याशिवाय कोण जास्त समजणार तिला???".

"मग राउत का???"

"सहज... कॉफी प्याविसी वाटली तुझ्यासोबत म्हणून..."

तिने हे हसण्यावर नेले. ह्या मुलीपण ना पक्क्या शहाण्या असतात... मुलाचा मुख्य उद्देश हसण्यावर नेतात नेहमी....

पण ऑफीसमध्ये अर्णवने मैत्री निभावायची तयारी चालू केली होती. त्या साल्याने चक्क माझ्या घरी कॉल केला होता. आणि माझ्या बायकोला सांगितलेपण की मी प्रभासोबत बाहेर फिरायला गेलो आहे... माझ्या बायकोचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. तिने त्याला उडवून लावले. पण त्या पठ्ठ्याने तिला प्रभाचा नंबर दिला आणि विचारायला सांगितले. आता मात्र तिच्या मनात थोडी भीती दाटायला सुरूवात झाली होती. तिची हिंमत होती नव्हती त्या नंबरवर कॉल करायला. पण तिचे मन स्वस्थही बसू देत नव्हते. सारखे सारखे तेच विचार येत होते मनात... हळू हळू त्या विचारांचे रुपांतर शंकेत व्हायला लागले होते. आणि का नाही होणार?? लग्नाला जेमतेम सहा महिने झाले होते आणि हे असे समजायला लागल्यावर एखादी स्त्री काय करणार??? ती पूर्णपणे बधीर झाली होती. तिला समजत नव्हते काय करावे. तरीही तिने हिंमत करून थरथरत्या हाताने फोन उचलला आणि अर्णवने दिलेल्या नंबरवर कॉल केला. इकडे प्रभाने नंबर बघितला अनोळखी होता. उचलला...

"हेलो.."

"हा..... हेलो.. हेलो.."

प्रभा इकडून हेलो हेलो करत होती...हिला समजत नव्हते की कसे विचारावे??... तेवढ्यात मी अजुन एक घोडचुक केली... फोन चालू असतानाच मी प्रभाला विचारले की स्नॅक्स काय घेणार?? तेवढ्यात फोन कट झाला होता..
इकडे तिने माझा आवाज ऐकला होता. तिला विश्वास बसत नव्हता. आता मात्र ती पूर्णपणे खचली होती. ती सारखी सारखी स्वतःला समजावत होती की कुणी दुसर्‍याचा आवाज होता... तरीही तिच्या मनात मोठा कलह माजला होता. शेवटी तिने ठरवले की जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत हे सर्व खोटे आहे. तिने अर्णवला कॉल केला आणि तिच्यासोबत राउतला यायला सांगितले. तो म्हटला की टॅक्सी घेऊन येतो. इमारतीच्या खाली आल्यावर मिस कॉल देतो. त्याप्रमाणे ते दोघे निघाले. आणि राऊतला पोहोचले. माझ्या मित्राने म्हटल्याप्रमाणे मैत्री निभावली होती.

इकडे मी स्टेजवर हातात माइक घेऊन काहीतरी बोलत होतो. तिने माझा आवाज ऐकला, आणि स्टेजकडे बघितले. आमच्या दोघांची नजरानजर झाली. तिचा चेहरा खूप सुजला होता. फक्त रडायची बाकी होती. मला माझी चुक समजली होती. तरीही मी माइक हातात घेतला आणि बोललो...

"अग.. इकडे ये..."

"मित्रहो... आत्ता मी जिच्याबद्दल बोलत होतो... ती ही आहे....”

तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला नीट समजत नव्हते... थोडीशी घाबरलेली, थोडीशी कावरीबावरी, थोडीशी आश्चर्यचकित... आणि खूप राग होता तिच्या चेहर्‍यावर.... ती स्टेजकडे येऊ लागली. जवळ आली... मी प्रभाला केक घेऊन यायला सांगितले...

आणि मी माईक हातात घेतला, एक पाय दुमडून गुडघ्यवार बसून बोललो..."मी तुझा खूप आभारी आहे ... माझ्या जीवनात आल्याबद्दल..."

ती अजुनही गोंधळलेली होती. पण आता चेहर्‍यावर फक्त आश्चर्याचे भाव होते. तिला समजत नव्हते की काय होत आहे.
"असे... अचानक.. मला काही समजत नाही आहे...."

"अग... आज पहिले वर्ष पूर्ण झाले तुला पहिल्यांदा बघायला.. म्हणजेच तू माझ्या जीवनात यायला एक वर्ष पूर्ण झाले...."

आता मात्र ती तिचे आसू थांबवु नाही शकली... माझ्या छातीवर डोके ठेऊन अक्षरशः रडायला लागली.... मी तिला तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांत करू लागलो. थोड्यावेळात ती ही शांत झाली. अजूनही पूर्ण राउत हॉटेलमधली लोक टाळ्या वाजवत होते. लग्नानंतरचे हे सर्वात पहिले सर्प्राइज़ होते..... :)






रोल नंबर  ४३



Thursday, December 1, 2011

पहिली भेट - भाग २

ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातल्या पात्रांचा घटनांचा कोण्याही व्यक्तीशी किंवा माझ्याशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास योगायोग समजावा.

कथेचा पहिला भाग येथे दिला आहे....
____________________________________________________







...... तिला शंका तर नक्कीच गेली होती माझ्या वागण्यावर... मी ही थोडासा सावध झालो होतो. तिला आता काही सरळ सरळ समजू द्यायचे नव्हते. तिला बघताना पण चोरून चोरून बघत होतो... खूप वाईट दिवस आले होते माझ्यावर... स्वतःच्या बायकोला पण चोरून बघावे लागत होते. :) ती किचनमध्ये खूप फास्ट होती. तिने चहा तर दिलाच पण लगेच डब्बा पण दिला... मग मात्र नाइलाजाने ऑफीसला निघावे लागले.


कारमध्ये बसलो आणि विचारचक्र सुरू झाले.....



६ महिने कसे निघून गेले ते कळलेच नाही आणि तिला ओळखायला ६ महिने लागले... सर्व चुक माझीच होती... कधी लक्षच दिले नाही हिच्याकडे. घर की मुर्गी डाल के बराबर असते ना ती अशीच... तसे आमच्या लग्नाला ६ महिने होत आले. पण तरीही ती नवीनच होती मला. आता कुठे तरी आमचे नवरा-बायकोचे नाते हळूहळू उलगडायला लागले होते. मला आजही आठवतोय तो दिवस, ज्या दिवशी मी तिला बघायला गेलो होतो. माझी ही पहिलीच वेळ होती. माझ्या मित्रांकडून बरेच सल्ले भेटले होते. काय विचारावे त्यासाठी..पण ते विचारण्यासारखे नव्हते. मी माझ्या घरच्यांसोबत तिच्या घरी गेलो. गेल्या गेल्या काय? कसे? त्रास झाला का? इत्यादी इत्यादी प्रश्न झाले. मला तर अगदी युध्दावर गेल्यासारखे वाटत होते. थोडा घाबरलेला, थोडा गोंधळलेला.... नेमक्या भावना शब्दात मांडणे खूप कठीण आहे. वडीलधाऱ्यांना तर फक्त कारणच लागते. त्यांच्या गप्पा फुल्ल रंगात येऊ लागल्या... पण माझी तर पूर्णपणे वाट लागली होती. मला काहीच समजत नव्हते की काय करावे? बस त्यांच्या गप्पा ऐकत बसण्याशिवाय पर्याय पण नव्हता. तेवढ्यात आतल्या घरातून एक मुलगी बाहेर आली... आणि सर्व शांत झाले. मला नक्की आठवत नाही की खरंच शांत झाले होते की मला भास झाला... पण मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. मी फक्त तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. ती खाली मान घालून पुढे चालत होती. तिने हलक्या आकाशी रंगाची साडी घातली होती. तिच्यासोबत तिची लहान बहीण होती. तिचा हात धरून तिला पुढे चालण्यास मदत करत होती. तिच्या चालण्यावरूनच समजत होते की तिला साडीची सवय नाही. मग घरातल्यांचे प्रश्न... आणि तिच्या घरातल्यांचे उत्तर हेच चालू होते बर्‍याच वेळ. शेवटी एकदाचे आम्हाला म्हटले की तुम्ही बाहेर बसून बोलू शकता. घरच्या बाहेर एक चांगला बगीचा होता. तिकडे २ खुर्च्या आणि एक टेबल ठेवला होता. तिकडे जाऊन बसलो. बराच वेळ शांतता होती. शेवटी वातावरण हलके व्हावे म्हणून मीच म्हटले,
"मी तुमचा फोटो बघितला आहे.. आणि मला तुम्ही आवडल्या आहात. फक्त आवाज नाही ऐकला... जर तो ऐकू आला तर ..."
"का?"
क्षणभर मी इकडे तिकडे बघितले..मला समजलेच नाही की तिने "का?" विचारले की माझे कान वाजले. एवढा बारीक आवाज...
"सहजच... जर तुम्ही लग्नाला हो म्हटल्या तर आयुष्यभर ऐकू येणार आवाज कसा असणार याबद्दल कुतूहल होते."
ती गालातल्या गालात हसली.
"तुम्हाला काही विचारायचे असेल तर विचारा...", मी म्हटलो.
"नाही...", ती म्हटली.
आता याचा अर्थ काय समजावा??? एक शब्दात उत्तरे भेटायला लागली ना, नेमके समजत नाही की तिचे मत सकारात्मक आहे की नकारात्मक. तिचे माझ्याबद्दलचे मत समजत नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून एक प्रश्न विचारला,
"तुम्हाला साडी घालायची सवय नाही ना..."
"हो, पण तुम्हाला कसे समजले???"
"तुम्ही चालताना अडखळत होता.. त्यावरून तर्क लावला...पण एक बोलू..."
"हो..."
"मला आवडेल माझ्या बायकोने साडी घातलेले..."
"मी सवय करून घेईन...”
बस्स्... माझ्या या प्रश्नाने मला पाहिजे तो कौल दिला होता...
यावरून मला आठवले की पहिल्यांदा बघितले तेव्हाच ती मला आवडली होती... आणि हेच विसरलो होतो....

मी गाडीला ब्रेक लावला. आताशा मला हा रस्ता पाठ झालाय. कितीही विचारात असलो तरीही मी हा रस्ता चुकत नाही. ऑफीस म्हणजे माझे दुसरे घरच झाले आहे... इथे खूप जवळचा असा मित्र आहे अर्णव आणि नेहमी मदत करणारी मैत्रीण आहे प्रभा. जेव्हापण हे दोघे सोबत असतात, ऑफीस लाइफ मस्त जाते. तसे या अर्णवला प्रभा आवडते. पण ऑफीसवाल्यांना खात्री आहे की प्रभाला मी आवडतो आणि अगदी माझे लग्न झाले तरीसुध्दा. असो, पण मी आणि अर्णव कधीही प्रभाचा विषय नाही काढत. किंबहुना त्याला नाही आवडत..मी प्रभाबरोबर बोललेले. पण तरीही त्यामुळे आमच्या मैत्रीमध्ये फरक नाही पडत.

ऑफीसमध्ये पोहोचलो आणि प्रभाच्या डेस्कवर गेलो तर अर्णव तिच्याशी बोलत होता. मी गप्पपणे माझ्या क्यूबिकलमध्ये जाऊन बसलो आणि कामाला लागलो. आज कामात माझे मन लागत नव्हते. मी हिच्याच विचारात होतो. मला तिच्याशी बोलायचे होते, पण मन धजत नव्हते. हक्काची बायको असूनही, एक अनामिक भीती होती मनात. तरीही हिंमत केली आणि फोन लावला. तिने उचलला.
"अग.. काय करतेस??"
"काही नाही... किचन साफ करत होते. "
"अच्छा.."
"फोन का केलात?? काही विसरलात का???"
आता हा काय प्रश्‍न झाला??? एवढ्या प्रेमाने कॉल केला ... त्यात हिला कसली चिंता की मी काही विसरलो का?? वाटले उत्तर द्यावे की विसरलो नाही पण मिस करतोय... नंतर सकाळचे उद्योग आठवले आणि गप्प झालो...
"सहज केला होता...चल तुझ्याशी नंतर बोलतो." आणि फोन ठेवला.
अजूनही मी माझ्या सकाळच्या धुंदीतुन बाहेर आलो नव्हतो. अर्णवला पिंग केले आणि बोललो की चल चहाला जाऊ. आम्ही दोघे कॅंटीनमध्ये आलो.


आता तिचा कॉल आला....





(क्रमशः)


रोल नंबर ४३


Monday, November 14, 2011

पहिली भेट - भाग १


ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातल्या पात्रांचा घटनांचा कोण्याही व्यक्तीशी किंवा माझ्याशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास योगायोग समजावा.


अशु , राज आणि सुजित यांचे त्यांनी केलेल्या मदतीबद्दल खूप खूप आभार...

____________________________________________________________




मला सकाळी सकाळी जाग आली. सहा वाजले होते. जास्त हालचाल केली नाही. तिला जाग आली असती कारण तिचा हात माझ्या छातीवर होता. हळुच तिचा हात उचलला आणि बाजूला झालो. उठलो आणि ब्रश करून बाहेर गॅलरीत आलो. आकाश पूर्व दिशेला सुंदर अश्या तांबुस रंगात न्हाऊन निघाले होते. डोंगराच्या पलीकडून सूर्य बाहेर येण्यासाठी आतूर झाला होता. सूर्याची सोनेरी किरणे बाहेर येऊ लागताच माझ्या वेड्या मनाला एक इच्छा झाली, हा सूर्योदय तिच्यासोबत बघण्याची. मान वळवून खिडकीमधून तिच्याकडे बघितले तर ती अजूनही झोपेतच होती. खूप सुंदर दिसत होती. सूर्याची कोवळी किरणे तिच्या चेहर्‍यावर पडल्याने एरवीचा तजेला वाढला होता. ती अगदी परीसारखी दिसत होती. तिचे ते ओठ आणि त्यावरच्या कोरीव आणि रेखीव भेगा नेहमीच घायाळ करतात मला. एरवी ती लीप-स्टिक लावते तेव्हा एवढे छान दिसत नाही आणि संध्याकाळी मी ऑफीसमधून घरी येईपर्यंत लीप-स्टिक उडून गेलेली असते. आणि नसेलच तर ती रात्री पुसली जाते. तिला अजुन कधी सांगितले नाही लीप-स्टिकबद्दल. पण आता तर तिचे ओठ बघून मी पुरता घायाळ झाला होतो. तिचे पूर्ण उशीभर पसरलेले केसही फार छान दिसत होते. सूर्याच्या किरणांमुळे त्यांना ग्लो आला होता आणि त्यामुळे ते चमकत होते. तिच्या केसांमध्ये मला गुरफटून जावेसे वाटत होते. तिच्या लांब, पण लहानपणी वेण्या घातल्यामुळे थोडे कुरळे झालेल्या केसांमध्ये मला हरवावेसे वाटत होते. आता मात्र मला स्वत:चा हेवा वाटत होता, एवढी सुंदर बायको भेटल्याबद्दल. आता मात्र मला खरंच म्हणावेसे वाटते की,

देख कर तुमको यकिं होता है
कोई ईतना भी हसीन होता है
देख पाते हैं कहाँ हम तुमको
दिल कहि होश कहि होता है...

सूर्य जरा जास्तच बाहेर आल्याने तेज थोडा वाढला होता. तिच्या चेहर्‍यावर होणारी चुळबुळ आणि तिची शरीराच्या हालचालीने त्याचा फरक जाणवला. मी लगेच धावत बेडवर गेलो आणि हळूच तिच्या कानात म्हटले,

"ए, उठ ना... मला ऑफीसला जायला उशीर होईल..."

"तुम्ही आंघोळ करून घ्या. मी उठतेच..."

मी पडत्या फळाची आज्ञा मानली आणि आंघोळीला गेलो. जाताना मागे वळून बघितले तर मी परत घायाळ झालो. तिने मस्त अंगडाई दिली होती... कसली सुंदर दिसत होती. अगोदर कधी एवढी सुंदरता, एवढे प्रेम, एवढ्या भावना हिच्यासाठी अनुभवल्या नव्हत्या. जेव्हा अश्या भावना येतात तेव्हा आपण असे काही नवीन प्रयोग करतो, जे त्यावेळी ठीक वाटतात पण थोड्यावेळाने आपल्याला समजते की आपण किती मूर्ख आहोत आणि हे सर्वच पुरूष करतात तर त्याला मी अपवाद कसा असणार?... धावत गेलो आणि टूथपेस्ट आणि ब्रश घेऊन आलो... ती गालात हसली आणि थोड्या शंकेनेच विचारले,

"ठीक आहे ना सर्व काही???"

मी म्हटले, "का गं? असे का विचारलेस??"

"नाही.. आज अगदी टूथपेस्ट आणि ब्रश हातात आणून दिलेत म्हणून विचारले". ती म्हटली.

"अगं, आज थोडा उशीर झालाय ना.... अजुन जास्त नको व्हायला म्हणून ...". मी म्हटलो आणि आंघोळीला निघालो.

जाताना मी एक कटाक्ष टाकला तेव्हा ती घड्याळ बघत होती आणि पुन्हा हसली. कारण काही उशीर झाला नव्हता आणि मला जे उत्तर तेव्हा सुचले ते दिले होते. माझा अतिउत्साहीपणा नडला होता. तिला शंका आली होती माझ्या वागण्यावर...अश्या गोष्टींमध्ये बायको नावाच्या व्यक्तीचे डोके फार भन्नाट चालते. पण तिलाही समजले नव्हते की आज माझ्यात हा बदल कसा झाला?

आज माझ्यात थोडा बदल झाला होता. मी थोडासा फास्ट झालो होतो. पटकन आंघोळ आवरली आणि मनाशी निश्चय करून बाहेर निघालो की आता परत असा मूर्खपणा नाही करायचा. बेडवर तिने माझे आज घालायचे कपडे काढून ठेवले होते. पटकन तयार झालो. ती आंघोळीला गेली होती म्हणून वर्तमान पत्र घेतले आणि वाट बघत बसलो चहाची. वर्तमान पत्र वाचण्यात काहीच लक्ष नव्हते. विचार केला आपणच चहा बनवावा आणि वळलो किचनकडे... ते ही उत्साहात... चहा उकळायला आलाच होता तेवढ्यात ती बाहेर आली आणि परत माझ्याकडे आश्चर्याने बघत परत गालातल्या गालात हसली. आहहा... काय सुंदर दिसत होती. तिच्या ओल्या केसांच्या बटा नियत फितूर करत होत्या. पण तिच्या त्या हसण्यामुळे मी परत भानावर आलो आणि मला परत असे वाटले की मी मूर्खपणा केला आहे. ती माझ्याकडे बघत चालू लागली ते चेहर्‍यावर जरासे शंकेचे भाव घेऊनच. मी थोडासा विचलित झालो, पण यावेळी सकाळसारखे फालतू उत्तर नाही द्यायचे असे ठरवले होते.

"आज काय झालाय तुम्हाला???" तिने विचारले....

"कुठे काय? काही नाही", मी उत्तरलो.

"नाही .. सकाळपासून बघतेय तुमची उठाठेव... अचानक काय झाले तुम्हाला??"

"तसे काही नाही ग... सहजच... उगाच उशीर नको व्हायला म्हणून हे सर्व काही..."

"काहीच लेट नाही झाले आहे.. सर्व काही वेळेवर आहे. तुमचीच धावपळ चालू आहे.."

"अग.. तसे काही नाही आहे... सहज आपलं... तुला मदत म्हणून.... तुला नाही आवडले का??", असे म्हणत मी तिला जवळ खेचले... हा सर्वात चांगला उपाय असतो... कुठल्याही परिस्थितीतून बाहेर पडण्याचा....फक्त बायको किंवा प्रेयसीसाठीच....

"आवडले ना... पण अचानक हे सर्व काही... ", ती बोलायची थांबली… अचानक झटका दिला आणि बोलली...

"तुम्हाला उशीर होतोय ना... मी चहा देते... तो पर्यंत तुम्ही तुमचे वर्तमान पत्र वाचा...."

निघालो मी शहाण्या बाळासारखा वर्तमान पत्र वाचायला... तिला शंका तर नक्कीच गेली होती माझ्या वागण्यावर... मी ही थोडासा सावध झालो होतो. तिला आता काही सरळ सरळ समजू द्यायचे नव्हते. तिला बघताना पण चोरून चोरून बघत होतो... खूप वाईट दिवस आले होते माझ्यावर... स्वतःच्या बायकोला पण चोरून बघावे लागत होते. :) ती किचनमध्ये खूप फास्ट होती. तिने चहा तर दिलाच पण लगेच डब्बा पण दिला... मग मात्र नाइलाजाने ऑफीसला निघावे लागले.

कारमध्ये बसलो आणि विचारचक्र सुरू झाले.....

(क्रमशः)

रोल नंबर  ४३

Saturday, May 14, 2011

निशाना (भाग १)

बास!!! आता खूप झाले!!!!! यार मी इकडे का आलो!!! तेच समजत नाही. गेल्या महिन्यात मला इकडे माझे असे कोणी भेटलेच नाही. एकदम एकाकी वाटायला लागलेय. भारतातच बरे होते. पकलोय तर फोन उचलायचा आणि कॉल करायचा. कोणी ना कोणी तर नक्की भेटतो बोलायला. नाही भेटले कोणी ते गर्लफ्रेंड होतीच. इकडे तर बोलायला कोणीच नाही. भारतात कॉल करायाच म्हटले तर महाग पडते आणि जरी हिंमत करायची इच्छा झालीच तरी वेळेचा फरक लगेच दिसतो. जेव्हा मी उठतो तेव्हा भारतात संध्याकाळ झालेली असते. सकाळी सकाळी काही वाटत नाही. पण जसा जसा दिवस सरकत जातो तसे तसे एकटेपणा वाढत जातो. तरी बरे मानवाने इंटरनेटचा शोध लावलाय. त्याने कमीत कमी बोलायला तरी भेटते आणि तेही फुकटात. नाहीच झाले तर फेसबूक आहेच टाइमपससाठी. अगोदर ओर्कुट हा मोठा टाइमपास होता. पण आज जर म्हटले की मी ओर्कुटवर आहे तर लोक खासकरून मुली आपल्याला खेड्यातला समजतात. तसे मी आणि माझी गर्लफ्रेंड ओर्कुटवरच भेटलो. बरीच वर्षे ओर्कुटवर काढल्यावर तिला जगासोबत पुढे जावेसे वाटले. तर ती माझ्या मागेच लागली की फेसबूक जॉइन कर, फसेबूक जॉइन कर. कारण विचारले तर म्हटली, "माझ्या मैत्रिणी तुला मागसलेला म्हणतात. पूर्ण जग फेसबूकवर शिफ्ट झाले आणि तू अजूनही ओर्कुटवरच." अशी तडक गेली डोक्यात... वाटले म्हणावे की जा आणि कोणी फेसबूकवरच शोध कोणी. पण प्रेमात आणि राजकारणात असे चालत नाही. भविष्यात जर युती करायची असेल तर वर्तमानात वाद नकोत. नाही तर बाबा ही जायचा आणि दसम्याही. म्हणून मीही शेवटी फेसाबूकवासी झालो, पण युती काही झाली नाही.
पण आजकाल फेसबूकवर पण टाइमपससाठी कोणीतरी शोधायचा म्हणजे प्रॉब्लेमच आहे. कारण कोणालाही रिक्वेस्ट पाठवली आणि ती अक्सेप्ट झाली तर सर्वांना कळते. चला ती अनोळखी असेल तर ठीक, पण गर्लफ्रेंड तर विचारणारच ना... की कोण आहे ती? हा प्रॉब्लेमसुध्दा मॅनेजीबल आहे. काहीही कारण सांगता येईल. जसे की जुनी मैत्रीण आहे किंवा अजुन काही दुसरे उत्तर देता येईल. पूर्ण इंजिनियरिंग तसाच तर पास झालोय, फेकून फेकून. पण मोठा प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा आपण एखादी चांगली आणि देखणी पोरगी शोधत असतो. कारण एक तर मुली स्वता:चा फोटो टाकता आमच्यासोबत पान, फूल, फळ खेळतात. म्हणजे त्यांनी फुलाचा, फळाचा किंवा देखाव्याचा प्रोफाइल फोटो म्हणून वापर केलेला असतो. त्यातल्या त्यात ज्या अतिहुशार मुली असतात त्या ग्रूप फोटो टाकतात, जणू काही खेळच खेळत असतात... सांगा मी कोण आहे???
१०० पैकी एखादा तीर् निशन्यावर लागतो. पण १०० तीर् मारता मारता नाकी नऊ येतात. असाच एक तीर् काही महिण्यापूर्वी लागला होता, एका सुंदर आणि देखण्या निशान्यावर. स्टेप बाय स्टेप प्रगती सुरू केली होती. भारतात होतो तोपर्यंत ठीक चालू होते. पण इकडे आलो आणि आमच्या "मैत्रीच्या" रिलेशनमध्ये प्रॉब्लेम्स सुरू झाले. मुद्दाम मैत्री हाइलाइट केली... नाही तर लोक आणि माझी गर्लफ्रेंड उगाचच शंका घेतात. गर्लफ्रेण्डला तर संधीच हवी असते शंका घेण्यासाठी, सोबत असती तरीही आणि नसली तरीही. हक्कच असतोना त्यांचा. असु दे.
माझ्या नवी निशान्याचे नाव "निशाना" होते, म्हणजे निशा नाईक. सहज टाइमपास म्हणून मी तिला फेसबूक रिक्वेस्ट पाठवली होती. मार्च मध्ये पाठवलेली रिक्वेस्ट जून उजाडला तरी बघितली गेली नव्हती. शेवटी वैतगलो आणि तिला पोक केले. सोबत झणझणीत असा एक मेसेजाही पाठवला. मला माहीत होते की ती मेसेज वाचल्यावर उत्तर येणारच आणि तो आलाही. आता हळू हळू मेसेजींग चालू झाली.
एकदा सहज विचारले "रिक्वेस्ट आक्सेप्ट का नाही केलीस अजुन?"
"तुला ओळखते कुठे अजुन?". ती उत्तरली.
"आपण गेले महिनाभर मेसेजींग करतोय. त्यात मी कळालो नाही का अजुन?"
"छे. ती तर मी फक्त तुझ्या प्रश्नांना उत्तरे दिलीत."
गरर्रर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!!! कसला राग आला होता मला हे उत्तर ऐकून. सांल मी काय महिन्यापासून झक मारतोय? पण याचेही कौतुक वाटले की पोरगी शहाणी होती. मग मी ही तसेच उत्तर दिले, अगदी शालीनतेने. त्याचे काय असते... मुली ना खूप भावनप्रधान असतात. एखादे भावनिक वाक्य मारले ना की त्या थोडा जास्त विचार करतात आपला. एकदा का जर तुम्ही तुमच्याबद्दल साधी भावना निर्माण करण्यात यसश्वी झाले तर ती तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही म्हणजे मासा गळाला लागलाच म्हणून समजा....
"मला माफ कर. माझ्यामुळे उगाचच तुझ्या बोटांना आणि मुख्यत्वे तुझ्या मेंदूला त्रास झाला. थोड्या प्रमाणात का होईना पण तुझ्या घरची वाया गेलेली वीज आणि की-बोर्डची झालेली झीज, यासाठी ही मला माफ कर. या चुकी साठी मी तू सांगशील ते प्रायश्चित्त करण्यास मी तयार आहे."
आणि या मेसेजाचा अपेक्षित असा परिणाम झाला होता. तिने माझी फ्रेंड-रिक्वेस्ट अप्रूव केली होती. नंतर काय मग.. फोटो शेरिंग, एकमेकांचे पोस्ट लाइक करणे नित्याचेच झाले. मध्ये एकदा म्हटली " तुला माझ्या प्रोफाइलवर माझ्या मैत्रिणिंचे पोस्ट नाही का आवडत?" मग काय तेव्हापासून तेही लाइक करणे चालू केले, कितीही बावळटासारखे लिहिले असतील तरीही. एकदा तिच्या मैत्रिणिने वाईट म्हटलेल्या फोटोलाही मी लाइक केले होते, तर मला त्या फोटोमध्ये नसलेलेही चांगले गुण शोधावे लागले होते.
नाही म्हटले तरी मी हळू हळू तिच्यामध्ये गुंतत होतो. एकदा ती अशीच सांगता निघून गेली. बरेच दिवस मे फसेबूकच्या वार्या केल्या पण काही उपयोग नाही. नाही नाही ते विचार मनात आले. ती अशी सांगता कशी जाऊ शकते. काहीतरी कारण असले पाहिजे, नाहीतर ती का जाणार? मी सर्व शक्यता पडताळून बघीतल्या. माझा कोणत्या गोष्टीचा राग आला असेल का??? माझी कॉमेंट आवडली नसेल का? इत्यादी इत्यादी...नाही तसे काही नव्हते. हवमानात झालेल्या बदलामुळे ती आजारी पडली असेल का??? .. नाही जरी आजारी पडली असती तरी ऑनलाइन तर आली असती ना... माझ्याकडे तिचा नंबर ही नव्हता. नाही तर कॉल केला असता. काय झाले असेल काहीच समजत नाही. आणि तिला ही कळत नाही की कोणीतरी तिची दररोज वाट बघत असेल.. काळजी करत असेल. खुशाल ना सांगता गायब झाली. येऊ दे तिला... नीट बघतो...
(क्रमश:)